Home People कल्पना चावला: भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर

कल्पना चावला: भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर

Kalpana chawla Indian astronaut. कल्पना चावला

कल्पना चावला या एक अशा विलक्षण महिला होत्या ज्यांनी अडथळ्यांवर मात करून विज्ञान आणि शोधाची आपली आवड जोपासली. १७ मार्च १९६२ मध्ये हरयाणा राज्यातील कर्नाल येथे जन्मलेल्या कल्पना चावला या अंतराळात प्रवास करणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या. तसेच त्या राकेश शर्मा यांच्या नंतर दुसऱ्या भारतीय अंतराळवीर बनल्या.

कल्पना चावला यांना लहानपणापासूनच विज्ञान आणि विमानचालनाची आवड निर्माण झाली होती. खरंतर शाळेत जाईपर्यंत त्यांचे अधिकृत नामकरण सुद्धा झाले नव्हते. त्यांना घरी सर्वजण मोंटू या नावानेच हाक मारायचे. असे म्हणतात की कल्पना हे नाव त्यांनी स्वतःच निवडले होते. त्यांनी १९८२ मध्ये पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून एरोनॉटिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्या युनायटेड स्टेट्समध्ये मध्ये गेल्या. तिथे त्यांनी १९८४ मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटी ऑफ अर्लिंग्टनमधून एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली. तसेच १९८८ मध्ये कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातून त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकी या विषयामध्ये पीएच.डी. प्राप्त केली.

अंतराळ विज्ञान या विषयातील अभ्यास पूर्ण केल्यानंतर, चावला यांनी कॅलिफोर्नियातील नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये संशोधन शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून काम केले. १९९४ मध्ये त्यांना NASA द्वारे अंतराळ मोहिमेसाठी निवडण्यात आले. त्यासाठी त्यांनी कठोर प्रशिक्षण घेतले.

चावला यांची पहिली अंतराळ मोहीम १९९७ मध्ये स्पेस शटल कोलंबियावर होती, जिथे त्यांनी मोहीम तज्ञ म्हणून काम केले. तेंव्हा अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला बनून त्यांनी इतिहास रचला. त्यानंतर २००३ मध्ये त्यांनी त्याच शटलवरून अवकाशात पुन्हा उड्डाण केले. परंतु १ फेब्रुवारी २००३ या दिवशी परतीच्या प्रवासात पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना शटलचे विघटन होऊन अपघाता दरम्यान अन्य सहा अंतराळवीरांसोबत त्यांचा दुःखदरित्या मृत्यू झाला.

त्या एक समर्पित आणि प्रतिभावान अंतराळवीर होत्या ज्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी ३० हून अधिक दिवस अंतराळात वास्तव्य केले. विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये भविष्य घडवू इच्छिणाऱ्या महिला आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक आदर्श उभा केला आहे.

स्वप्नांपासून यशापर्यंतचा मार्ग अस्तित्वात असतो. तुम्हाला तो शोधण्याची दृष्टी, त्यावर चालण्याचे धैर्य आणि त्याचे अनुसरण करण्याची चिकाटी मिळो.

कल्पना चावला

आजही कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ स्थापित केलेल्या असंख्य पुरस्कार, शिष्यवृत्ती आणि स्मारकांद्वारे त्या जिवंत आहेत. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना न जुमानता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने लाखो युवकांना दिली आहे.

Exit mobile version